ankush tv18 news-( Advocate vijay Danej)
kalyan –
कल्याणमध्ये बेकायदेशीर बांधकाम प्रकरण तापले : केडीएमसीच्या आदेशानंतरही कारवाई शून्य, भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण
कल्याण (पूर्व) : प्रभाग ५/ड अंतर्गत मौजे काटेमानिवली येथील स.नं. १३ मधील गाळा नं. ९, संदिप नगर, शंकर पावशे रोड, साई अलतेजा बिल्डिंगसमोरील दुकान गाळ्यावर सुरू असलेल्या वाढीव बेकायदेशीर बांधकामाविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात आजपर्यंत अतिक्रमण हटविण्याची हिंमत प्रशासन दाखवू शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, करोडो रुपयांच्या देवाणघेवाणीच्या चर्चांना उधाण आले आहे.


महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, बिनशेती परवाना, ७/१२ उतारा आदी कागदपत्रांसह १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधित व्यक्तींनी सुनावणीकडे पाठ फिरवत कोणतेही अधिकृत दस्तऐवज सादर केले नाहीत.
त्यानंतरही श्रीमती दिपाली अरुण कचरे यांच्या तक्रारीनंतर पुन्हा संधी देण्यात आली. तरीदेखील आजतागायत कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या पाहणीदरम्यान संबंधित ठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी निवासी व व्यावसायिक वापर सुरू असल्याचेही पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे बांधकाम श्री. महेंद्र गजराज यादव यांनी केल्याचे, तर सध्याचा मालकी हक्क श्री. सोहनलाल पकाराम चौधरी यांच्या नावावर असल्याचे समोर आले. संबंधित मिळकतीचे वीजबिलही चौधरी यांच्या नावावर असल्याची नोंद आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २५३ किंवा २५४ अंतर्गत कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. काम थांबविण्याच्या नोटिसीनंतरही बांधकाम पूर्ण करण्यात आल्याने हा गंभीर नियमभंग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (५/ड प्रभाग) श्री. उमेश यमगर यांनी सुनावणीनंतर सदर तळ अधिक दोन मजली बांधकाम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४७८ व २६० (२) अन्वये अनधिकृत घोषित करत १५ दिवसांत स्वखर्चाने बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते.
मात्र आदेशानंतरही संबंधित बांधकाम आजही जागेवर ठाण मांडून उभे असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. केडीएमसी प्रशासन, कल्याणचे आयुक्त तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? की करोडो रुपयांची देवाणघेवाण झाल्यामुळेच अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले आहेत? अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे आयएएस अधिकारी Dr. Shrikrishna Panchal तसेच सहाय्यक आयुक्त श्री. उमेश यमगर यांच्या आदेशानंतरही प्रत्यक्ष पाडकाम न झाल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांच्या छोट्या बांधकामांवर तत्काळ हातोडा चालवणारे प्रशासन या प्रकरणात मात्र मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.





