अकोट | प्रतिनिधी : रेणुका देशमुख
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्या मूल्यांकन समितीवर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा अकोट येथील पत्रकार विजय मनोहरराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीमार्फत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचे मूल्यमापन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड केली जाणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी रमाकांत माळी यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीत विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (पंचायत), अंगणवाडी पर्यवेक्षिका, संगणक परिचालक तसेच तालुका पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” हे ग्रामीण विकासाला चालना देणारे महत्त्वाकांक्षी अभियान मानले जात असून ग्रामपंचायती अधिक सक्षम, स्वच्छ, पारदर्शक आणि लोकसहभागातून कार्यक्षम बनविणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
दरम्यान, विजय मनोहरराव शिंदे यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





