अकोला | प्रतिनिधी (रेणुका देशमुख, अकोट)
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने अकोला जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले असून, आणखी पाच केंद्रांना नोटिसा बजावून सक्त ताकीद देण्यात आली आहे.
तीन केंद्रांवर निलंबनाची कारवाई
सुनावणीदरम्यान समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामुळे खालील केंद्रांवर कारवाई करण्यात आली:
- अकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी लि., अकोट — २ महिने निलंबन
- जयेश ॲग्रो सेंटर, चोहट्टा बाजार (ता. अकोट) — २ महिने निलंबन
- तायडे ॲग्रो सेंटर, आलेगाव (ता. पातूर) — १ महिना निलंबन
तपासणीत उघड झालेल्या त्रुटी
जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांनी केलेल्या अचानक तपासणीत एकूण ८ कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये:
- नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना दिसेल असे न लावणे
- गोदामातील प्रत्यक्ष साठा व नोंदींमध्ये तफावत
- शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे
- साठा व दरफलक अद्ययावत न ठेवणे
या प्रकरणी संबंधित केंद्रचालकांची जिल्हास्तरावर सुनावणी घेण्यात आली होती.
शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, विक्रेत्यांनी काळाबाजार किंवा ‘लिंकिंग’ करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी खरेदी करताना खालील बाबींची काळजी घ्यावी:
- नामांकित कंपन्यांची उत्पादनेच खरेदी करावीत
- पक्के बिल घेणे अनिवार्य
- बिलावरील लॉट नंबर व किंमत तपासावी
प्रशासनाचा इशारा
“शेतकऱ्यांची लुबाडणूक खपवून घेतली जाणार नाही. ज्या केंद्रांवर अनियमितता आढळली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, पुढेही ही मोहीम सुरू राहील,” असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रार कुठे करावी?
शेतकऱ्यांनी तक्रार असल्यास संबंधित तालुक्यातील पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर यापुढेही कडक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.



