AKOT PRESS REPORTER
RENUKA DESHMUKH
AKOLA – ४० वर्षांपासून नाली नाही; आलेवाडी ग्रामस्थांचा संताप उसळला, ३० मे रोजी उपोषणाचा इशारा
आलेवाडी | प्रतिनिधी
गेल्या तब्बल चार दशकांपासून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत आलेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही नाली व्यवस्था नसल्याने नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे.
गावातील रस्त्यांवर सांडपाणी साचत असल्यामुळे डासांची वाढ, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत अंतिम इशारा दिला आहे.
दि. ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात मंगेश गजानन वानखडे, गणेश भोंगळ, अनिल भोंगळ, गजानन ग. वानखडे, शेषराव ह. वानखडे, गजानन श्रीराम वानखडे, सुमित वानखडे, शंकर सासणकर, अर्जुन जळमकर, नीलकंठ वसू, पुरुषोत्तम वानखडे यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले की,
“यावेळीही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




