Ankush tv18 news network
बिलोली प्रतिनिधी – गणेश कदम
बिलोली तालुक्यातील अटकळी व टाकळी येथे काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राज्यसभेचे सदस्य माननीय खासदार अजित गोपछडे यांनी टाकळी गावाला भेट दिली. पूरग्रस्त भागात फिरून त्यांनी शेतकऱ्यांशी व गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची झालेली कमतरता तसेच घरगुती हानी याबाबत गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर मन मोकळे केले. खासदार गोपछडे यांनी शासनाच्या माध्यमातून तातडीची मदत व शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पूरस्थितीमध्ये वेगाने आणि सक्षमतेने कार्य करणाऱ्या पोलिस प्रशासनाची त्यांनी विशेष दखल घेतली. गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी व मदतकार्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाचे त्यांनी कौतुक केले. हराळे यांना त्यांच्या धाडसी व तत्पर कामगिरीबद्दल खासदारांनी शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला. पूरग्रस्त भागाची पाहणी दरम्यान स्थानिक कार्यकर्ते व अटकळी, टाकळी गावातील नागरी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांनी खासदारांचे मनापासून स्वागत करून त्यांच्या भेटीबद्दल आभार मानले.