
जळगाव | प्रतिनिधी
भाजप पक्षाकडून सन 2018 मध्ये आमदार राजू मामा भोळे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील अनेक योजना आजही सुमारे २३०० कोटी रुपयांच्या निधीबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप होत आहे ? . जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात न उतरल्याने त्या केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र समोर येत आहे.
शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आदी महत्त्वाच्या बाबींवर मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर अनेक वर्षे उलटूनही या योजनांची अंमलबजावणी न झाल्याने जळगावकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विशेष म्हणजे, सुमारे २३०० कोटी रुपयांच्या निधीबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोपही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. हा निधी नेमका कुठे खर्च झाला, कोणत्या कामांवर वापरण्यात आला, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर न आल्याने जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या वेळी दाखवलेली विकासाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरली नसून जाहीरनामा हा केवळ मत मिळवण्याचे साधन ठरला. त्यामुळे संबंधित योजनांची श्वेतपत्रिका जाहीर करावी व निधीच्या वापराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या आरोपांवर भाजप किंवा संबंधित आमदार यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येणाऱ्या महानगरपालिका व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा जळगाव शहराच्या राजकारणात ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.





