पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे १५ मार्च रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा.
उपक्रमाचे १३वे वर्ष; ५१ जोडप्यांच्या विवाहाचा संकल्प
पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना सहकार्य करणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यावर्षी रविवार, १५ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार आहे. ही माहिती फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जयकिशन गोयल, सरस्वती गोयल, महावीर रतनलाल गोयल, विनोद अग्रवाल, सीमा अग्रवाल, मनोज अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या काळात वाढत चाललेली सामाजिक व आर्थिक विषमता लक्षात घेता सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. अशा उपक्रमांमधून खऱ्या अर्थाने मानवसेवा घडते, असे मत राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. हा विवाह सोहळा ज्येष्ठ समाजसेवक रतनलाल गोयल यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, आजकाल विवाह समारंभांवरील अवाजवी खर्चामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडतात. विशेषतः मुलीच्या विवाहाची चिंता पालकांसाठी मोठे ओझे ठरते. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे समाजात एकता, सहकार्य व सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देतात.
या सोहळ्यात विवाहबंधनात अडकणाऱ्या प्रत्येक जोडप्यास अलमारी, पंखा, गादी, चादर, मिक्सर, देवघर (देवहारा) तसेच भांडी संच अशा घरगुती उपयोगाच्या वस्तू भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत. तसेच वर-वधूस संपूर्ण वस्त्रसामग्री, मंगळसूत्र व आवश्यक वैवाहिक साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हिंदू परंपरेनुसार पार पडणारा हा धार्मिक विवाह सोहळा तीन एकर परिसरात पसरलेल्या भव्य गोयल गार्डनमध्ये, आईमाता मंदिरासमोर, गंगाधाम रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे १३वे वर्ष आहे. मागील वर्षी २५ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडले होते. गेल्या १२ वर्षांत एकूण २४१ जोडप्यांचे विवाह या सोहळ्याच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. यावर्षी ५१ जोडप्यांचे विवाह करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी पूर्णतः मोफत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व नाशिक विभागातील इच्छुक व गरजू जोडप्यांनी 9049992560 / 9422025049 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
गोयल कुटुंबाच्या सामाजिक संवेदनशीलतेतून साकारलेला हा उपक्रम गरीब, निराधार व सामान्य समाजघटकांना सन्मानपूर्वक वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्याची सुवर्णसंधी देईल, असा विश्वास राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.





