ankush tv18 news network –बार्शी न्यायालयात चुकीचे साक्षी समन्स, निर्दोष नागरिकाला विनाकारण हजेरी, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

बार्शी : न्यायालयातून पाठविण्यात आलेल्या साक्षी समन्समुळे एका नागरिकाला विनाकारण न्यायालयाची पायरी चढावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचा मूळ प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना साक्षीदार म्हणून साक्षी समन्स बजावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधत १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले. ‘RCC क्रमांक १०६/२०२२’ या भांडणाच्या प्रकरणात साक्षीदार म्हणून नाव असल्याचे कळविण्यात आले. साक्षी समन्स व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात आले होते. गैरहजर राहिल्यास वॉरंट काढण्यात येईल, असा उल्लेख असल्याने संबंधित व्यक्तीमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
केवळ दोन दिवसांचा अवधी, त्यात न्यायालयीन सुट्टी — अशा परिस्थितीत पडताळणीची संधीही मर्यादित होती. निर्देशानुसार संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर राहिली असता, त्या दिवशीच्या कामकाजाच्या यादीत ना प्रकरणाचा उल्लेख होता, ना संबंधित नाव.
चौकशीअंती साक्षी समन्स चुकून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासकीय हलगर्जीपणाचा नमुना?
न्यायालयीन समन्स ही अत्यंत गंभीर प्रक्रिया मानली जाते. चुकीच्या पद्धतीने समन्स बजावल्यास सामान्य नागरिकांना मानसिक ताण, आर्थिक नुकसान आणि प्रतिष्ठेवर परिणाम सहन करावा लागू शकतो. विशेषतः, संबंधित व्यक्ती परगावी किंवा सेवेत दूर असती, तर परिस्थिती अधिक गंभीर ठरली असती.
जबाबदारी निश्चित होणार?
चुकीचे समन्स पाठविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
अशा त्रुटींवर अंतर्गत चौकशी होणार का?
भविष्यात अशी चूक टाळण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यान्वित केली जाणार?
या घटनेमुळे न्यायालयीन प्रक्रियेतील अचूकता आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणी अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे.




